नाफेडकडून राज्यात कांद्याची विक्री नाही
Kanda bajarbhav
गेल्या काही दिवसापासून कांद्याच्या भावात सातत्याने घसरण होत असून मागणीपेक्षा पुरवठा अधिक असल्याने तसेच केंद्र सरकारने खरेदी केलेला कांदा आता बाजारात विक्रीसाठी काढल्याने बाजारभाव कोसळत असल्याचे म्हणणे शेतकरी मांडत आहेत.
त्यातच शेतकऱ्यांनाही साठवणूक केलेला कांदा विक्रीला आणला आहे.
याबाबत नाफेड ने स्पष्ट केले आहे की, ग्राहक व्यवहार विभाग (DoCA), भारत सरकार यांच्या निर्देशांनुसार नाफेडने या वर्षी महाराष्ट्रात केवळ १२ मेट्रिक टन (MT) कांद्याचीच विक्री केली आहे. या पेक्षा अधिक विक्री झालेली नाही. त्याचप्रमाणे सध्या राज्यात नाफेडकडून कांद्याची विक्री केली जात नसल्याचेही नाफेडच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांचे हित जपणे व बाजारातील स्थिरता राखणे हेच नाफेडचे सर्वोच्च प्राधान्य असून नाफेड शासनाच्या निर्देशांनुसारच सातत्याने कार्यरत राहील, असे सांगून नाफेड अशा प्रकारच्या खोट्या बातम्या व अफवांचा तीव्र निषेध करते आणि त्या पसरविणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही नाफेड मार्फत देण्यात आला आहे.