बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2025 च्या पिकविम्याची नुकसान भरपाई तातडीने द्या - कृषीमंत्री
Beed Pikvima 2025
खरीप हंगाम 2025 मध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन ही बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्याप ही पीकविमा नुकसान भरपाई मिळालेली नाही.
जिल्ह्यात या संदर्भात मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहेत, शेतकऱ्यांमध्ये मोठा रोष आहे. याच पार्श्वभूमीवर 26 मे 2026 रोजी राज्याच्या कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बीड जिल्ह्याच्या पीकविमा भरपाई संदर्भात मंत्रालयात एक बैठक पार पडली.
या बैठकीला आमदार विजयसिंह पंडित, कृषी विभागाचे सचिव परिमल सिंह, कृषी संचालक विनयकुमार आवटे तसेच शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.
याच बैठकीत कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांना वेळेत आणि न्याय्य नुकसानभरपाई मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कार्य करत प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावावेत असे स्पष्ट निर्देश प्रशासनाला दिले आहेत.
राज्यात सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना उत्पादन आधारित पद्धतीने आणि पीक कापणी प्रयोगांच्या आधारे राबविण्यात येत आहे.
बीड जिल्ह्यात या योजनेची अंमलबजावणी आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडमार्फत करण्यात येत असून, शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत आवश्यक निर्णय तातडीने घेण्यात यावेत, असे निर्देश कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या बैठकीत दिले.