आता या शेतकऱ्यांनाही मिळणार नुकसान भरपाई | nuksan bharpai gr

आता या शेतकऱ्यांनाही मिळणार नुकसान भरपाई  nuksan bharpai gr


जळगांव जिल्ह्यातील २७४ गावांतील १५ हजार ६६३ शेतकऱ्यांच्या केळी पीकांचे सन २०२२ मध्ये सीएमव्ही (कुकुंबर मोझॅक व्हायरस) या रोगामुळे नुकसान झाल्यामुळे त्यांना नुकसानापोटी  १९ कोटी ७३ लक्ष रुपये एवढ्या मदतीचे वितरण करण्याचे आदेश मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिले आहेत. 

याबाबतचा शासन निर्णय नुकताच जारी झाला आहे. कुकुंबर मोझॅक व्हायरस या रोगामुळे ‘केळी’ या बहुवार्षिक पिकाच्या नुकसानासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पहिल्यांदाच अशा प्रकारची मदत देण्यात आल्याचे मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.

मंत्री श्री. अनिल पाटील म्हणाले की, तत्कालीन वादळी पावसाच्या तडाख्याने केळीबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते आणि शेतकऱ्यांनी नवीन लागवड केलेल्या केळीबागांवर व्हायरसचे नवीन संकट आले होते. 

या रोगामुळे बाधित झालेले एकूण क्षेत्र ८७७१ हेक्टर एवढे होते. जिल्ह्यातील सर्व बाधित शेतकऱ्यांना २ हेक्टरच्या मर्यादेचा निकष पाळून दि.२७ मार्च २०२३ रोजीच्या शासन निर्णयातील सुधारित दर व निकषांप्रमाणे एकूण १९ कोटी ७३ लक्ष एवढी मदत देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना यातून दिलासा मिळेल, असेही मंत्री श्री.पाटील म्हणाले.


सन 2022 च्या पावसाळी हंगामात सी. एम. व्ही. रोगाच्या प्रादुर्भावामुळे जळगाव जिल्ह्यात झालेल्या केळी पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता निधी वितरीत करणेबाबत...