अन्न व औषधे विभागाचा पदभार स्वीकारताच आयुक्त तुकाराम मुंढे ॲक्शन मोडवर, राज्य भेसळीविरुद्ध मोठी कारवाई.
Safe food Safe Drug Safe Maharashtra Campaign
राज्यात Safe Food Safe Drug Safe Maharashtra Campaign राबविण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.
राज्यात ३० व ३१ मे २०२६ या दोन दिवसात तब्बल ३२ आरोपींना अटक करण्यात आली असून, २६ आस्थापना सील व १२ लाख १६ हजार ९६५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याचबरोबर२९ ते ३१ मे २०२६ या कालावधीत राज्यातील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर छापे टाकून आंबे, बुंदी लाडू, खवा, बेकरी पदार्थ, कँडी, गुळ, खाद्यतेल, तूप, खजूर, आईसक्रिम/कुल्फी, फ्रोजन डेझर्ट, मसाल्याचे पदार्थ, शेंगदाणा चिक्की इ. अन्न पदार्थ तसेच भेसळ म्हणून वापरण्यात येणारे अन्न पदार्थाच्या सुमारे ९७ लाख १९ हजार ९६३ रुपये किंमतीचा ८४ हजार ३३५ किलो इतका साठा जप्त केला आहे.
राज्यात अस्तित्वात असलेल्या अन्न सुरक्षा व मानके कायद्याअंतर्गत मुंबई, नवी मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, नाशिक, भंडारा, जालना, बीड व नांदेड, परभणी, सोलापूर, छत्रपती सांभाजीनगर, हिंगोली, वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशिम या जिल्ह्यांमध्ये कारवाई करण्यात आली आहे.
यात पुणे जिल्ह्यातील दौंड मध्ये गुळात साखरेच्या भेसळ प्रकरणी ३ ठिकाणी छापे टाकण्यात आले असून तब्बल १५ हजार ९६ किलो साखर व १० लाख ६६ हजाराचा भेसळयुक्त माल जप्त करण्यात आला आहे.
याचबरोबर आंबे पिकवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या इथिलिन स्प्रे व प्रतिबंधित द्रवाचा वापर केल्या प्रकरणी ३ ठिकाणी ११ लाख १२ हजार रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला.
राज्यात नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरुद्ध भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १२९ अंतर्गत कठोर कारवाई केली जाणार आहे.
यासाठी राज्यात Safe Food Safe Drug Safe Maharashtra Campaign ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.
नागरिकांनी अन्नपदार्थाच्या दर्जाबाबत शंका येताच अन्न व औषध प्रशासनाशी संपर्क साधावा. तक्रार करतेवेळी स्वतःचे नाव व पत्ता/संपर्क क्रमांक, भेसळ केल्या जाणाऱ्या ठिकाणाचा या आस्थापनेचा अचूक पत्ता व कोणत्या अन्नपदार्थात भेसळ केली जाते याची माहिती तक्रारीत नमूद करावी, असे आवाहन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.
यासाठी राज्यात अन्न व औषधाच्या दर्जाबाबतची तक्रार करण्याकामी प्रशासनाकडून नवीन अॅप विकसित करण्यात येणार असून नागरिकांना त्यावर तक्रार करणे सोपे होणार आहे तसेच नागरिकांना तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांकही देण्यात येणार आहे.