अतिवृष्टीमुळे जमिनी खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना दिलासा; महाराष्ट्राच्या श्रमिक बजेट मध्ये वाढ.
Maharashtra Labour Budget 2026
राज्यात सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेत जमिनी मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झाल्या होत्या, नदी ओढ्याच्या पाण्यामुळे जमिनी खरडून गेल्या होत्या.
या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने अतिरिक्त मदत देण्याचा निर्णय घेतला होता.
ज्यामध्ये खरडून गेलेल्या जमिनीची दुरुस्ती साठी सरकारने हेक्टरी ३ लाखापर्यंत अनुदान देण्याची घोषणा केली होती. ही दुरुस्तीची कामे मनरेगा ( ग्रामीण रोजगार हमी योजना) अंतर्गत करण्याचे उद्दिष्ट घेण्यात आले होते. यासाठी राज्य शासनाने केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.
अखेर केंद्र सरकारने २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी ग्रामीण विकास विभागाच्या उच्चाधिकार समितीने VB-G RAM-G ( विकसित भारत रोजगार आणि आजीविका मिशन हमी ग्रामीण ) योजनेअंतर्गत महाराष्ट्राचे श्रमिक बजेट १३०० लाख मनुष्य दिवसावरून १६०० लाख मनुष्य दिवस करण्यास मंजुरी दिली आहे.
केंद्र सरकारचे ग्रामीण विकास विभागाचे सचिव शैलेशकुमार सिंग यांच्या अध्यक्षतेत ही बैठक नवी दिल्ली येथे झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
या निर्णयाचा महाराष्ट्राला फार मोठा लाभ मिळणार आहे. यातून ग्रामीण भागात अनेक रोजगार संधी निर्माण होणार असून, ग्रामीण पायाभूत सुविधांच्या कामांना सुद्धा बळकटी येईल. विशेषत: मजुरांची संख्या वाढणार असल्याने अकुशल कामगारांना त्याचा मोठा लाभ होणार आहे.