राज्यात खते, बियाणांचा तुटवडा नाही; शेतकऱ्यांना खते, बियाणे कमी पडणार नाही
![]() |
खरीप हंगामातील राज्याचे सरासरी पेरणीचे क्षेत्र 142 लाख हेक्टर असून दि. 17 जुलै, 2023 अखेर प्रत्यक्षात 88.44 लाख हेक्टर (62 टक्के) पेरणी झालेली आहे. सद्यस्थितीत ठाणे, गोंदिया, रायगड, सांगली, भंडारा या पाच जिल्ह्यामध्ये सरासरीच्या तुलनेत कमी क्षेत्रावर पेरणी झालेली आहे.
कापूस व सोयाबीन या पिकाचा विचार करता या दोन्ही पिकाखालील असणा-या क्षेत्राच्या तुलनेत सरासरी 83 टक्के पेरणी झालेली आहे. राज्यात पेरणीच्या कामास वेग येत आहे. या मध्ये प्रामुख्याने कापूस, सोयाबीन, तूर या पिकांच्या पेरण्या तसेच भात पिकाच्या पुनर्लागवडीची कामे सुरू आहेत.
खरीप हंगाम 2023 करीता 19.21 लाख क्विं.बियाणे गरजेच्या तुलनेत सद्यस्थितीत प्राथमिक अंदाजानुसार 21.78 लाख क्विं.बियाणे उपलब्ध आहे. राज्यात 19 लाख 21 हजार 445 क्विंटल (100 टक्के) बियाणे पुरवठा झालेला आहे.
त्यामुळे राज्यात खरीप हंगामा करिता आवश्यक बियाणे साठा उपलब्ध आहे. बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेते यांचेकडून बियाणे खरेदी करावे तसेच पावती व टॅग जपून ठेवणे आवश्यक आहे.
खरीप हंगाम 2023 करिता राज्यास 43.13 लाख मे. टन खतांच्या पुरवठ्याचे नियोजन मंजूर असून आतापर्यंत 48.34 लाख मे. टन खतांचा साठा उपलब्ध झाला आहे. त्यापैकी 21.31 लाख मे.टन खतांची विक्री झालेली असून सद्यस्थितीत राज्यात 27.03 लाख मे. टन खतांचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आवश्यकतेनुसार खतांची खरेदी करावी.
महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाच्या एक रुपया मध्ये पिक विमा या योजनेमध्ये शेतकऱ्यांचा उत्कृष्ट असा सहभाग असून दिनांक 17 जुलै 2023 पर्यंत 66.05 लाख शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये सहभाग घेतलेला असून विमा संरक्षित क्षेत्र 42.30 लाख हेक्टर एवढे आहे.
खरीप हंगामात प्रधानमंत्री पिक विमा योजनेची अंतिम मुदत 31 जुलै 2023 असल्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
कृषीविषयक योजनांच्या माहितीसाठी व तक्रारींचे निवारण करण्यासाठी 18002334000 हा हेल्पलाईन नंबर असून शेतकरी बंधूंनी आवश्यकतेनुसार त्याचा वापर करण्याचे आवाहन महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाने केले आहे.
विशिष्ट खताचा आग्रह धरू नये.बाजारात पर्यायी सरळ व संयुक्त खते उपलब्ध आहे.पर्यायी खत उपलब्धतेबाबत नियोजन करण्यात आले आहे. डीएपीला पर्याय म्हणून एसएसपी + युरिया कॉम्बिनेशन, प्रोम यांच्या वापराला चालना देण्यात येत आहे. पोटॅशला पर्याय म्हणून पीडीएम वितरणासाठी खत कंपन्यांना उद्युक्त करण्यात येत आहे.
वॉटर सोलुबल फर्टिलायझर्सची उपलब्धता व वापर वाढविणेबाबत प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात खते, बियाणांच्या उपलब्धतेबाबत तुटवडा भासणार नाही. राज्यात खते, बियाणांचा साठा पुरेसा उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी कोणतीही काळजी करू नये. शासन आपल्या पाठीशी ठामपणे उभे आहे, असे कृषि विभागाने म्हटले आहे.